Headlines

मराठी चित्रपट थरथराट फेम भालचंद्र कुलकर्णी यांचे आकस्मिक निधन, चित्रपटसृष्टीला बसला धक्का !

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन( Senior Actor Bhalchandra Kulkarni Pass Away)
मराठी सिनेसृष्टीचे ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे आज अल्पशा आजराने निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. त्यानंतर त्यांना रुग्ण्यालयात भरती करण्यात आले.

काल त्यांना डीसचार्जसुद्धा देण्यात आला होता. मात्र शनिवारी सकाळी त्यांची तब्येत पुन्हा बिघडली आणि त्यांची प्राणज्योत मावळली. भालचंद्र कुलकर्णी यांच्या निधनानाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत विविध ढंगाच्या विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत.

अभिनयात येण्यापूर्वी ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या अभिनयातील करीअरची सुरुवात दिवंगत गीतकार जगदीश खेबुदकर यांचे नाटक गावरान मेवामधून केली होती. त्यांनी 300 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात झुंज तुझी माझी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’, ‘जावयाची जात’, नवरा नको गं बाई, पिंजरा, मुंबईचा जावई , सोंगाड्या, थरथराट, खतरनाक अशा चित्रपटांचा समावेश होता.

त्यांच्या कारकिर्दीत १९८४ साली आलेल्या ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणं प्रचंड गाजलं. आजही या गाण्याच्या तालावर लोक थिरकतात. अभिनेते भालचंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालकदेखील होते.

आतापर्यंत कुलकर्णी यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. चित्रपट महामंडळाने त्यांना ‘चित्रभूषण पुरस्कार’ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.